---Advertisement---
राज्यात पुढील काही दिवस हवामानात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. 13 ते 17 मार्चदरम्यान मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टी वगळता उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज असून विशेषतः 15 आणि 16 मार्च रोजी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
या दोन दिवसांत विदर्भ आणि मराठवाडा विभागासह उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच दक्षिण महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतही काही ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यातील काही भागांमध्ये उष्णतेची तीव्रताही वाढणार आहे. 14 मार्चपर्यंत काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. कोकणातील अलिबाग आणि डहाणू तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक आणि विदर्भातील अकोला, अमरावती व बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये तापमान वाढण्याची शक्यता आहे
.
बदलत्या हवामानाचा परिणाम शेती कामांवर होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन सावधगिरीने करावे तसेच उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.









