---Advertisement---
देशात एलपीजी (LPG) पुरवठ्यावर परिणाम होत असताना केंद्र सरकारकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. युद्धग्रस्त आखाती प्रदेशातून भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. तब्बल 94 हजार मेट्रिक टन एलपीजी इंधन घेऊन दोन मोठी जहाजे भारताकडे रवाना झाली आहेत, ज्यामुळे लवकरच पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार, बीडब्ल्यू टीवायरआर (BW Tyrr) आणि बीडब्ल्यू ईएलएम (BW Elm) ही दोन एलपीजी वाहक जहाजे सुरक्षितपणे युद्धग्रस्त क्षेत्रातून बाहेर पडली आहेत. या दोन्ही जहाजांवर एकूण सुमारे 94,000 मेट्रिक टन एलपीजी साठा आहे.
BW Tyrr हे जहाज 31 मार्च 2026 रोजी मुंबई बंदरात पोहोचण्याची शक्यता आहे.BW Elm हे जहाज 1 एप्रिल 2026 रोजी मंगळुरू येथे दाखल होणार आहे.
या घडामोडींमुळे देशातील एलपीजी तुटवड्यावर काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, पश्चिम आखाती प्रदेशात सध्या 485 भारतीय खलाशांसह 18 भारतीय ध्वजांकित जहाजे कार्यरत आहेत. जहाज महासंचालनालय, जहाज मालक आणि संबंधित एजन्सी यांच्या समन्वयातून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, सर्व भारतीय खलाशी सुरक्षित असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे.
देशातील बंदरांवरही परिस्थिती नियंत्रणात असून कोणतीही कोंडी नाही. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, केरळ, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरी या राज्यांतील सागरी वाहतूक सुरळीत सुरू आहे.
तसेच, एलपीजीच्या पर्याय म्हणून सरकारने PNG (Piped Natural Gas) चा वापर वाढवण्यावर भर दिला असून त्यासाठी विशेष कृती कार्यक्रम राबवला जात आहे.
एकूणच, युद्धजन्य परिस्थिती असूनही भारताकडे एलपीजीचा पुरवठा सुरू राहावा यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असून, येणाऱ्या काही दिवसांत परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत.









