---Advertisement---
गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले, तर दुसरीकडे तापमानात घट झाल्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला होता. मात्र आता पावसाने उसंत घेतली असून, जळगावकरांना पुन्हा कडक उन्हाचा चटका बसण्यास सुरुवात झाली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस वातावरण कोरडे राहणार असून तापमान वाढण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यातील वादळी पावसामुळे तापमान ३५ ते ३६ अंशांदरम्यान होते. मात्र पश्चिमेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्रात उकाडा वाढू लागला आहे. रविवारी जळगावमध्ये कमाल तापमान ३५.५ अंश तर किमान तापमान २१.४ अंशाची नोंद झाली. दिवसभर उकाडा जाणवत असला तरी सकाळ-संध्याकाळ थोडा गारवा जाणवत आहे.
येत्या आठवड्यात मात्र परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. जळगावसह जिल्ह्यातील तापमान ४० अंशांच्या आसपास पोहोचण्याचा अंदाज हवामान खात्याकडून दिला जात आहे. १२ ते १३ एप्रिलनंतर उन्हाची तीव्रता अधिक वाढेल, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात तापमान ४२ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली असून उष्णतेची लाट येण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









