---Advertisement---
मुंबई/नवी दिल्ली : हॉर्मूझ सामुद्रधुनी परिसरात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाजवाहतुकीवर परिणाम होत असल्याचे चित्र समोर आले आहे. अमेरिका–इराण वाद तीव्र झाल्याने तेल व गॅस वाहतुकीवर परिणाम होऊन जागतिक स्तरावर तुटवड्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, भारतीय ध्वजधारी कच्चे तेलवाहू जहाज ‘देश गरिमा’ने 18 एप्रिल 2026 रोजी हॉर्मूझ सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली असून, हे जहाज 22 एप्रिलला मुंबई येथे पोहोचण्याची अपेक्षा आहे. जहाजावर 31 भारतीय खलाशी असून सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.
मात्र, मागील 24 तासांत दोन भारतीय जहाजांना धोक्याचा सामना करावा लागला. व्हीएलसीसी ‘सम्नार हेराड’ आणि बल्क कॅरियर ‘जग अर्णव’ ही जहाजे हॉर्मूझ सामुद्रधुनीतून जात असताना गोळीबाराची घटना घडली. या घटनेनंतर दोन्ही जहाजांनी पर्शियन आखाताकडे माघार घेतली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.या घटनेची गंभीर दखल घेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयने नवी दिल्ली येथे इराणच्या राजदूतांना तातडीने बोलावले. बैठकीत भारताने या घटनेबाबत तीव्र चिंता व्यक्त करत व्यापारी जहाजे व भारतीय खलाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची मागणी केली.
परराष्ट्र सचिवांनी इराणकडील संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत भारताची भूमिका पोहोचवण्याचे निर्देश देत, हॉर्मूझ सामुद्रधुनीतील जहाजवाहतूक शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्याचे आवाहन केले. सर्व भारतीय खलाशी सुरक्षित असून परिस्थितीवर सरकारकडून बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याची माहिती पेट्रोलियम मंत्रालयने दिली.
दरम्यान, या तणावामुळे आशियासह जगभरात तेल आणि एलपीजी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.









