२३ वर्षांनंतर गिरणा माय पाजणार पाणी! मन्याड परिसरातील २२ गावांची तहान भागणार; २० मे नंतर आवर्तन

---Advertisement---

 

जळगाव : चाळीसगाव तालुक्यात शेतीसाठी वरदान ठरणाऱ्या ‘मन्याड’ धरण परिसरातील २२ गावांच्या घशाला कोरड पडली आहे. त्यामुळे टंचाई काळात तब्बल २३ वर्षांनंतर गिरणा माय आवर्तनाच्या माध्यमातून पाणी पाजणार आहे. त्यादृष्टीने गिरणा पाटबंधारे विभागाकडून हालचाली सुरू झाल्या कालवा दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असताना आवर्तन सुटणार असल्याने पाण्याची नासाडी होणार नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
मन्याड धरणाच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील २२ गावांच्या शिवारात खरीप व रब्बी हंगामातील पिकांना मोठा आधार मिळत आहे. २३ वर्षापूर्वी गिरणा धरणातून उन्हाळ्यात मन्याड धरणात आवर्तन सोडले जायचे. मात्र कालव्यांअभावी पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी व्हायची. त्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त अन्य हंगामात मन्याड आवर्तनाला मुकले होते.
तशातच पावसाळ्यात गिरणा धरण तुडुंब भरल्यानंतर मन्याडसह अन्य प्रकल्पांसाठी आवर्तन सोडले जात आहे. मात्र गिरणा पाटबंधारे विभागाने गेल्या वर्षभराच्या कालावधीत कालव्यांची मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती केली. त्यासाठी कोट्यवधींचा खर्चही केला आहे.


तिसरे आवर्तन सोडणार
ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मन्याड धरणात आवर्तन सोडण्याची मागणी केली. पावसाळ्यासह नंतरच्या कालावधीत दोन आवर्तन सोडले असताना टंचाई काळात तिसरे आवर्तन सोडता येईल का, अशी विचारणा जिल्हास्तरीय समितीने केली आहे. त्यानुसार गिरणा पाटबंधारे विभागाने पिण्यासाठी तिसरे आवर्तन सोडण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. दि.२० मेनंतर टंचाई काळात आवर्तन सोडले जाणार आहे. तब्बल २३ वर्षांनंतर टंचाई काळात पहिल्यांदाच आवर्तन सोडले जाणार आहे.

पिण्यासाठी गिरणा धरणातून ‘मन्याड’ सोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या प्रस्तावाची अंमलबजावणी झाल्यास टंचाई काळात २३ वर्षांनंतर मन्याड धरणात आवर्तन सोडले जाईल. कालव्यांच्या दुरुस्तीमुळे पाण्याची नासाडी होणार नाही, याचीही चाचपणी झाली आहे.
विजय जाधव, उपविभागीय अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---