प्रभावी नियोजन व योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीमुळे ग्राहकांना अखंडित व स्वस्त वीज देण्यात महावितरण यशस्वी- सीएमडी श्री.लोकेश चंद्र

---Advertisement---

 

महाराष्ट्रात या वर्षी विजेची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली. महावितरणने ही मागणी  विनाअडथळा पूर्ण केली. प्रभावी नियोजन, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची परिणामकारक अंमलबजावणी, कृषिपंपांचे विक्रमी सौर उर्जीकरण तसेच नवीकरणीय ऊर्जेची मोठ्या प्रमाणात निर्मिती व वापर यामुळे महावितरणला विजेची वाढती मागणी पूर्ण करणे शक्य झाले. आगामी काळात विजेची वाढती मागणी तसेच शेतकऱ्यांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना अखंडित व स्वस्त दरांत वीजपुरवठा करण्यास महावितरण पूर्णपणे सक्षम आहे, अशी ग्वाही महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.लोकेश चंद्र यांनी दिली. तसेच कंपनी शेअर बाजारात लिस्टिंग होणार असल्याने महावितरणला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनीच मिशन मोडवर काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

महावितरण कंपनीचा २१ वा वर्धापन दिन महावितरणचे मुख्यालय प्रकाशगड मुंबई येथे उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.लोकेश चंद्र बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक श्री.विश्वास पाठक तसेच महावितरणचे संचालक (संचालन तथा प्रकल्प) श्री. सचिन तालेवार, संचालक (वित्त) श्री.अनुदीप दिघे, संचालक (वाणिज्य) श्री.योगेश गडकरी, संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार हे प्रामुख्याने उपस्थित होते.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र म्हणाले की, मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेतून राज्यात देशातील सर्वाधिक १० लाखांपेक्षा अधिकचे सौरपंप स्थापित करण्यात आले आहेत. तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत जगातील सर्वात मोठ्या १६ हजार मेगावॅट विकेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. या दोन्ही योजनांमध्ये झालेल्या कामांमुळेच विजेची मागणी विभागली गेली व विक्रमी विजेची मागणी पूर्ण करणे शक्य झाले. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीतही महाराष्ट्र अल्पावधीतच देशात अव्वल ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र म्हणाले, महावितरणने प्राधान्य दरांवर सर्व ऊर्जा स्त्रोतांमध्ये आतापर्यंत ७२ हजार ९१८ मेगावॅट क्षमतेच्या वीज खरेदीचे दीर्घकालीन करार (पीपीए) केले आहेत. यामध्ये ४७ हजार ३४७ मेगावॅट (६५ टक्के) अपारंपरिक ऊर्जेचा समावेश आहे. वीज खरेदीमध्ये १० हजार कोटींच्या वार्षिक बचतीसोबतच क्रॉस सबसिडीमध्ये १३ हजार ५०० कोटींनी वार्षिक बोजा कमी होणार आहे. त्यामुळे प्रामुख्याने औद्योगिक व व्यावसायिक विजेचे दर स्वस्त होत जाणार आहेत. स्मार्ट मीटर, सब स्टेशन मॉनिटरींग सिस्टिम अशा विविध अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विजेची हानी कमी करण्यात यश येत आहे. मात्र या कामांना आणखी गती देण्याची आवश्यकता आहे. मिशन मोडवर काम होत असल्यानेच महावितरणला जवळपास १०० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. डिसेंबर अखेरपर्यंत महावितरण शेअर बाजारात नोंदणीकृत होणार असून कर्मचाऱ्यांनाही त्यात वाटा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी स्वतंत्र संचालक श्री. विश्वास पाठक यांनी अलीकडच्या काळात महावितरणने केलेली प्रगती थक्क करणारी असून कंपनी शेअर बाजारात लिस्टिंग होणार असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यापुढे अधिक सक्षमपणे कार्य करण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमात संचालक (संचालन तथा प्रकल्प) श्री. सचिन तालेवार, संचालक (वाणिज्य) श्री.योगेश गडकरी, संचालक (मानव संसाधन) श्री.राजेंद्र पवार यांनी मार्गदर्शन केले. कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांनी महावितरणच्या प्रगतीचा आढावा सादर करताना नुकताच  पीएम-सूर्यघर योजनेत देश पातळीवरील १० पैकी ८ पुरस्कार एकट्या महावितरणला मिळाले. त्यात नागपूर जिल्ह्याला दुसरा क्रमांक मिळाल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांनी वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या संदेशाचे प्रसारण या वेळी करण्यात आले. संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी प्रास्ताविक करताना वर्धापन दिनानिमित्त कष्टांचा, पाहिलेल्या स्वप्नांचा आणि गाठलेल्या यशांचा आपण उत्सव साजरा करीत असल्याचे सांगितले. याप्रसंगी त्यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कंपनी व कामाप्रती कटिबद्धतेची शपथ दिली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री.ललित गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाला महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---