---Advertisement---
नवी दिल्ली – मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतासह जगभरात इंधन आणि गॅस तुटवड्याचे संकट गडद होत असून, एलपीजी पुरवठ्याबाबत चिंताजनक संकेत समोर येत आहेत. देशात पुढील तीन ते चार वर्षे गॅस टंचाई भासू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, संघर्षामुळे उर्जा उत्पादन प्रकल्पांना मोठे नुकसान झाले आहे. या प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. त्यामुळे एलपीजी पुरवठा अल्पकालीन की दीर्घकालीन विस्कळीत राहणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
भारत मोठ्या प्रमाणात एलपीजीसाठी पश्चिम आशियावर अवलंबून आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत या भागातील तणावामुळे समुद्री वाहतूक विस्कळीत झाली असून, पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव आणि नाकेबंदीमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
अमेरिका-इस्रायलच्या कारवायांनंतर इराणने प्रत्युत्तरादाखल ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केल्याने उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला आहे. यामुळे जागतिक स्तरावर एलपीजी पुरवठा कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर देशातील गॅस उपलब्धता, दरवाढ आणि सर्वसामान्य नागरिकांवरील परिणाम याबाबत सरकारची चिंता वाढली असून, आगामी काळात परिस्थिती हाताळणे मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.









