---Advertisement---
नवी दिल्ली: जागतिक राजकारणातील वाढता तणाव आणि इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवणारे काही अहवाल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. विशेषतः विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुका संपताच इंधन दरवाढ होईल, असा दावा या बातम्यांमध्ये केला जात होता. मात्र, केंद्र सरकारने आता या सर्व बातम्यांचे अधिकृतपणे खंडन केले असून नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करून या अफवांवर पडदा टाकला आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले की, इंधनाचे दर वाढवण्याबाबत सध्या कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. “अशा बातम्या केवळ अफवा असून त्या नागरिकांमध्ये घबराहट निर्माण करण्यासाठी पसरवल्या जात आहेत,” असे मंत्रालयाने आपल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, भारत हा जगातील अशा मोजक्या देशांपैकी एक आहे जिथे गेल्या चार वर्षांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही मोठी वाढ झालेली नाही.
केंद्र सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी समन्वयाने काम केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढले तरी, त्याचा थेट बोजा सर्वसामान्यांवर पडू नये यासाठी सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारची दरवाढ करण्याची गरज नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
निवडणुकांनंतर पेट्रोल-डिझेल महाग होणार असल्याच्या चर्चा केवळ अफवा असून, केंद्र सरकारने दरवाढीचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले आहे.









