---Advertisement---
जिल्ह्यासह जळगाव शहरातून थंडीने अखेर काढता पाय घेतला असून आता उन्हाचा चटका स्पष्टपणे जाणवू लागला आहे. रविवारी (२२ फेब्रुवारी) जळगाव शहराचा पारा तब्बल ३५.४ अंश सेल्सिअसवर पोहोचला. यंदाच्या हंगामातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान ठरले आहे.
गेल्या आठवड्यापासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. सकाळचा गारवा जवळपास नाहीसा झाला असून सकाळी १० वाजताच कडक ऊन पडू लागते. फेब्रुवारी महिन्यातच मार्चसारखा उकाडा जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २८ फेब्रुवारीपर्यंत तापमान ३३ ते ३४ अंशांच्या दरम्यान स्थिर राहू शकते. मात्र, मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उष्णतेची तीव्रता वाढणार आहे. १ ते ५ मार्चदरम्यान तापमान ३५ ते ३७ अंशांच्या दरम्यान जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
७ मार्चनंतर अवकाळी पावसाचे संकेत
उष्णतेनंतर अवकाळी पावसाची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही भागांत पावसाचा अंदाज आहे. ७ ते ८ मार्चदरम्यान जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस होऊ शकतो, असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
गेल्या वर्षी मार्च आणि मे महिन्यात पावसाने हजेरी लावली होती. मात्र यंदा मार्चच्या अखेरीपासून उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांवर परिणाम?
अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच तापमानातील अचानक बदलामुळे सर्दी, ताप, घसा खवखवणे यांसारख्या आजारांमध्ये वाढ होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना काळजी घेणे, पुरेसे पाणी पिणे आणि शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.









