NEET पेपरफुटीवरून प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी, ‘UPSC’ कडे परीक्षा सोपवण्याचा प्रस्ताव!

---Advertisement---

 

NEET-UG 2026 च्या पेपरफुटी प्रकरणामुळे देशातील शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. या सर्व गोंधळावर आता राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी थेट केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांनी अजून राजीनामा का दिला नाही?” असा परखड सवाल आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. तसेच, ‘नीट’ परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडून काढून घेऊन ती केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (UPSC) सोपवण्याची आग्रही मागणी त्यांनी केली आहे.


​प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत तिखट शब्दांत केंद्र सरकार आणि शिक्षणमंत्र्यांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, “धर्मेंद्र प्रधान यांचा उद्दामपणा आणि अहंकार त्यांना पदाचा राजीनामा देण्यापासून रोखत आहे. त्यांचा हा अहंकार त्यांच्या मंत्रिपदाच्या खुर्चीविषयीची आसक्ती दाखवून देतो.” NEET-UG 2026 ची प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे देशातील तब्बल २३ लाख विद्यार्थ्यांचे कष्ट वाया गेले असून त्यांचे करिअर आणि भविष्य धोक्यात आले आहे, हे वास्तव स्वीकारण्याची मानसिकता सरकारची दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.


​’NTA’ कडून अधिकार काढून ‘UPSC’ कडे देण्याची मागणी

​वारंवार होणारे कथित घोटाळे आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकारांमुळे परीक्षा प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी परीक्षा पद्धतीत मोठ्या सुधारणेची गरज व्यक्त केली. NEET परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने पार पाडण्यासाठी ही जबाबदारी ‘NTA’ ऐवजी ‘UPSC’ कडे सोपवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र, त्यापूर्वी शिक्षणमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
​देशात संतापाची लाट; २३ लाख विद्यार्थ्यांना मोठा फटका
​गत ३ मे रोजी झालेल्या NEET 2026 परीक्षेचा पेपर अवघ्या ३ दिवसांतच फुटल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) संपूर्ण परीक्षाच रद्दबातल ठरवली. यामुळे देशातील २३ लाख विद्यार्थ्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. आता ही परीक्षा येत्या २१ जून रोजी पुन्हा घेतली जाणार आहे.

परीक्षा प्रक्रियेतील ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून विविध राज्यांत विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
​दुर्दैवी घटना: परीक्षा रद्द झाल्याच्या नैराश्यातून आतापर्यंत देशभरातील ६ विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत १० हून अधिक जणांना अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे.
​विरोधी पक्षांकडूनही केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयावर टीकेची झोड उठवली जात आहे. मात्र, तूर्तास तरी केंद्र सरकारने या मागण्यांकडे आणि विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे. आता २१ जूनला होणाऱ्या फेरपरीक्षेकडे आणि सरकार यावर काय पावले उचलते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---