---Advertisement---
महाराष्ट्र राज्यातील जनतेला हादरवून सोडणारी एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडली आहे. अवघ्या चार वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेने माणुसकीलाच काळीमा फसली असून समाजमन सुन्न झाले आहे.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान समोर आलेल्या प्राथमिक वैद्यकीय शवविच्छेदन अहवालात काही अत्यंत धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. आरोपीने मुलीचा आवाज बाहेर जाऊ नये आणि तिने प्रतिकार करू नये यासाठी आरोपीने चिमुरडीच्या तोंडात बोळा कोंबून अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकारामुळे या गुन्ह्याचे गांभीर्य अधिकच वाढले असून नागरिकांमध्ये संतापाची भावना तीव्र झाली आहे.
शवविच्छेदनातून असेही स्पष्ट झाले आहे की, पीडित मुलीच्या शरीरावर मारहाणीचे गंभीर व्रण आढळले आहेत. या प्रकरणात केवळ अत्याचारच नव्हे, तर अत्यंत क्रूरतेने हत्या करण्यात आल्याचे तपासातून पुढे आले आहे. त्यामुळे तपास यंत्रणांवर गुन्हेगाराविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून कठोरात कठोर कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे.
नसरापूरच्या या घटनेचे पडसाद राज्यातील विविध भागांमध्ये उमटताना दिसत आहेत. सोलापूरसह अनेक ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. निषेध नोंदवत कॅण्डल मार्च काढण्यात आले असून आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून कठोर कायदे आणि प्रभावी अंमलबजावणीची गरज अधोरेखित केली जात आहे.
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास मुलगी अचानक बेपत्ता झाल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने शोध सुरू केला. काही वेळातच पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आणि पोलिसांनी तात्काळ हालचाली करत शोधमोहीम सुरू केली. अत्यंत वेगाने कारवाई करत अल्पावधीतच संशयिताला ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरू असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे. पीडितेला न्याय मिळावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी प्रशासनाने ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मतही व्यक्त होत आहे









