---Advertisement---
महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी १२ मे २०२६ रोजी मतदान होणार असून, याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबतचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदान सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत होईल.
१३ मे रोजी विद्यमान ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार असल्याने ही निवडणूक होत आहे. यात उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा समावेश आहे.
विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीला स्पष्ट आघाडी असून भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी मिळून सुमारे ८ उमेदवार सहज निवडून आणू शकतात. विधान परिषदेसाठी एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ सुमारे ४६ असल्याने त्यांचा एक उमेदवार निवडून येणे निश्चित मानले जात आहे. मात्र दुसऱ्या जागेसाठी आवश्यक असलेली अतिरिक्त मते मिळवणे त्यांच्यासाठी सध्या आव्हानात्मक ठरत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीकडे अतिरिक्त १३ मते असल्याने महायुतीकडून अधिक उमेदवार दिल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.









