मंत्रालयात मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनात ACB ची धाड; लिपिक लाच घेताना अटक, कार्यालय सील….!

---Advertisement---

 

महाराष्ट्राच्या सत्तेचे केंद्र असलेल्या मंत्रालय इमारतीत गुरुवारी खळबळ उडवणारी घटना घडली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग – ACB) थेट मंत्र्यांच्या दालनात कारवाई करत मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील एका लिपिकाला 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परवाना नूतनीकरणाच्या कामासाठी तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर ३५ हजार रुपये स्वीकारताना ACBने सापळा रचत संबंधित लिपिकाला तिसऱ्या मजल्यावर पकडले. कारवाईनंतर ACBने झिरवाळ यांचे कार्यालय सील केले असून लाचखोरीचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत जातात, याचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणात काही धक्कादायक नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तक्रारदाराला परवाना नूतनीकरणासंदर्भात कार्यालयीन काम होते. आरोपानुसार संबंधित लिपिकाने या कामासाठी सुरुवातीला 50 हजार रुपयांची मागणी केली. चर्चेनंतर 35 हजार रुपयांवर तडजोड झाली. तक्रारदाराने याबाबत ACBकडे अधिकृत तक्रार नोंदवली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACBने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे पैसे स्वीकारताच अधिकाऱ्यांनी लिपिकाला रंगेहात ताब्यात घेतले. त्यानंतर पंचनामा आणि प्राथमिक चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

या घटनेवर मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया:

या घटनेवर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तातडीने प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट केले की संबंधित कर्मचारी हा सरकारी सेवक असून त्याच्या वैयक्तिक कृत्याशी आपला कोणताही संबंध नाही.

त्यांनी पुढे म्हटले, “या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. जर चौकशीत माझ्यापर्यंत किंवा माझ्या कार्यालयातील इतर कोणापर्यंत धागेदोरे पोहोचले, तर मी तत्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देईन.” या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला अधिक उधाण आले आहे.

मंत्रालयातील तिसरी मोठी ACB कारवाई:

मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनात ACBने कारवाई करण्याची ही तिसरी वेळ मानली जाते. यापूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात राजेंद्र दर्डा यांच्या कार्यालयावर कारवाई झाली होती. त्यानंतर भाजप सरकारच्या काळात एकनाथ खडसे यांच्या कार्यालयातील स्वीय सहाय्यकावर लाचखोरीप्रकरणी कारवाई झाली होती.
आता नरहरी झिरवाळ यांच्या दालनात झालेली ही कारवाई प्रशासनासाठी गंभीर बाब मानली जात आहे.

या घटनेनंतर विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मंत्र्यांच्या दालनातच लाच व्यवहार उघड झाल्याने सरकारची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. काही नेत्यांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, सत्ताधारी गटाकडून मात्र “चौकशी पूर्ण होईपर्यंत निष्कर्ष काढू नयेत” अशी भूमिका मांडली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---