---Advertisement---
महाराष्ट्रावर पुढील 24 तासांत मोठं हवामान संकट ओढवण्याची शक्यता आहे. एकीकडे थंडी कमी होत उकाडा वाढत असतानाच राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू झाली आहे.
भारतीय हवामान विभाग (IMD) यांनी राज्यासाठी यलो अलर्ट जारी केला असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह गारपीट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा दिला आहे.
कमी दाबाचा पट्टा सक्रिय
दक्षिण कर्नाटकापासून मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून केरळ किनारपट्टीजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे वातावरण अस्थिर झाले असून ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वाढली आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
गेल्या दोन दिवसांत झालेल्या गारपीटीमुळे गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
चंद्रपूर आणि यवतमाळ येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस झाला. देठना परिसरातील अल्पभूधारक शेतकरी हनुमान कच्छवे यांचा तीन एकर ज्वारीचा प्लॉट पूर्णपणे जमीनदोस्त झाला.
बीड जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
यात्रेत गोंधळ
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथे अवकाळी पावसामुळे गजानन महाराज यात्रेत गोंधळ उडाला. अचानक पावसामुळे विक्रेते आणि दुकानदारांची मोठी धावपळ झाली असून अनेकांच्या साहित्याचे नुकसान झाले आहे.
पुढील अंदाज
आज राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.









