---Advertisement---
देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 1 एप्रिल रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सहा महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. राज्यातील पायाभूत सुविधा, पर्यावरण, शेती, शिक्षण आणि सामाजिक न्याय क्षेत्राला गती देणारे हे निर्णय असल्याचे मानले जात आहे.
बैठकीतील प्रमुख निर्णय पुढीलप्रमाणे:
नदी पुनरुज्जीवनासाठी प्राधिकरण स्थापन
राज्यातील 54 प्रदूषित नदी पट्ट्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून नदी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनावर भर दिला जाणार आहे.
साकळाई उपसा सिंचन योजनेस मोठी मंजुरी
अहिल्यानगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी तब्बल 1,234 कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली. या योजनेमुळे 32 अवर्षणग्रस्त गावांना फायदा होणार असून सुमारे 9,600 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
अमरावतीत क्रीडा संकुल उभारणी
अमरावती महापालिकेला मौजे नवसारी येथे 16,708 चौ.मी. जागा क्रीडा संकुलासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे स्थानिक क्रीडापटूंना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ
राज्यातील आठवी ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. तब्बल 12 वर्षांनंतर ही वाढ होत असून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
भूकरमापक पदनामात बदल
भूमि अभिलेख विभागात ‘भूकरमापक’ पदाऐवजी ‘परिरक्षण भूमापक’ असे नवीन पदनाम देण्यात आले आहे. हे पद पदोन्नती व विभागीय भरतीद्वारे भरण्यात येणार असून कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
अनुसूचित जाती उपवर्गीकरणावर समिती
अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत आलेल्या निवेदनांवर निर्णय घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे.









