---Advertisement---
राज्यातील वाढत्या तापमानाचा आणि उष्णतेच्या लाटेचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. विदर्भात उष्णतेची तीव्रता कायम राहिल्यास यंदा शाळा नेहमीप्रमाणे १५ जूनऐवजी थेट २६ जूनपासून सुरू करण्याचा विचार सरकारकडून केला जात असल्याची माहिती गृहराज्यमंत्री Pankaj Bhoyar यांनी दिली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असून, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी हे सध्या देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. येथे नुकतेच ४७.२ अंश सेल्सिअस इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ तर नागपूर आणि यवतमाळसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की, “१० जूननंतरही विदर्भात उष्णतेची लाट कायम राहिली तर १५ जूनपासून सुरू होणाऱ्या शाळा २६ जूनला सुरू करण्याबाबत सरकार विचार करेल. शालेय शिक्षण विभाग लवकरच यासंदर्भात बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहे.”
दरम्यान, नागपूर विद्यापीठातील परीक्षा सकाळच्या सत्रात घेण्याचा निर्णयही घेण्यात आला असून, विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, राज्यातील प्री-प्रायमरी शाळांचे नोंदणीकरण बंधनकारक करण्यासाठी ‘प्री-प्रायमरी स्कूल रजिस्ट्रेशन अॅक्ट’ आणण्याची तयारी सरकारकडून सुरू असल्याची माहितीही मंत्री भोयर यांनी दिली. या कायद्याचा मसुदा सध्या विधी व न्याय विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून, आगामी अधिवेशनात तो मांडला जाण्याची शक्यता आहे.









