---Advertisement---
सोशल मीडियावरील ओळखीतून सुरू झालेल्या एका अनोख्या प्रकरणाची चर्चा सध्या उत्तर प्रदेशात रंगली आहे. इन्स्टाग्रामवर झालेली मैत्री पुढे भावनिक नात्यात बदलल्याचा दावा करत एका ४० वर्षीय महिलेने थेट पोलीस ठाणे गाठल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरखपूर येथील रहिवासी असलेल्या महिलेची काही काळापूर्वी इन्स्टाग्रामवर एका अल्पवयीन मुलाशी ओळख झाली. रील्स लाईक करणे आणि चॅटिंगमधून दोघांमध्ये संवाद वाढला. महिलेच्या म्हणण्यानुसार, या ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले.
महिलेने पोलिसांकडे दिलेल्या माहितीत संबंधित मुलाने आपल्याशी लग्न केल्याचा दावा केला. मात्र, याबाबत कोणताही अधिकृत पुरावा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, संबंधित मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेत दोन्ही बाजूंची माहिती जाणून घेतली.
या प्रकरणातील महिला चार मुलांची आई असून तिचा मोठा मुलगा १९ वर्षांचा आहे. त्यामुळे या घटनेची परिसरात मोठी चर्चा सुरू झाली होती. संबंधित मुलगा आपल्या कुटुंबासोबत चेन्नई येथे राहत असल्याची माहिती आहे.
महिलेने मुलगा आता संपर्क टाळत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. त्यानंतर नौतनवा पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंशी चर्चा करण्यात आली. पोलिसांनी समुपदेशन करून प्रकरण शांततेने निकाली काढल्याची माहिती दिली.
पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, महिलेने कोणतीही पुढील कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिला. दोन्ही बाजूंनी भविष्यात परस्पर संपर्क ठेवणार नसल्याचे मान्य केल्यानंतर प्रकरणावर पडदा पडला आहे.









