ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पेटणार! “जरांगे बाजेवर, तर आम्ही ढेकळात बसणार”; लक्ष्मण हाकेंचा राज्य सरकारला थेट अल्टिमेटम

---Advertisement---

 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. काल रात्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी दीड तास मनधरणी करूनही तोडगा न निघाल्याने जरांगे आपल्या आंदोलनावर ठाम राहिले. दरम्यान, जरांगेंच्या या उपोषणाला प्रतिउत्तर म्हणून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला थेट अल्टिमेटम दिला असून, अत्यंत आक्रमक आंदोलनाची घोषणा केली आहे. “मनोज जरांगे जर बाजेवर (खाटेवर) बसून आंदोलन करत असतील, तर आम्ही थेट ढेकळात (मातीत) बसून आंदोलन करू,” असा इशारा हाकेंनी दिला आहे.


​माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, “मनोज जरांगे यांनी दबावतंत्राचा वापर करून जे आंदोलन सुरू केले आहे, ते जर असेच चालू राहिले आणि ओबीसींच्या हक्काचे आरक्षण हिरावण्याचा प्रयत्न झाला, तर संपूर्ण राज्यातील ओबीसी बांधव रस्त्यावर उतरतील. उद्या सकाळी आम्ही एक विशेष पत्रकार परिषद घेणार असून, त्यामध्ये ओबीसींच्या या नव्या आक्रमक आंदोलनाचे गाव, वेळ आणि ठिकाण जाहीर केले जाईल.”


​”जरांगेंना ना अक्कल, ना तारतम्य; ‘ते’ मागणीच हास्यास्पद”

​मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी स्वतंत्र ‘मराठा मंत्रालय’ किंवा ‘कुणबी मंत्रालय’ स्थापन करण्याची मागणी केली आहे. या मागणीचा लक्ष्मण हाके यांनी चांगलाच समाचार घेतला.
​”महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून राजकारणावर आणि सत्तेवर मराठा समाजाचेच वर्चस्व राहिले आहे. मंत्रिमंडळात दोन-चार ओबीसी, एससी, एसटी किंवा अल्पसंख्याक मंत्री सोडले, तर अख्खं मंत्रिमंडळ कायमचं मराठा नेत्यांच्या हातात राहिलं आहे. असे असताना स्वतंत्र मंत्रालयाची गरजच काय?” असा सवाल त्यांनी केला.
​पुढे बोलताना त्यांनी अत्यंत बोचरी टीका केली की, “जेव्हा एखाद्या चळवळीचे नेतृत्व अडाणी माणूस करतो, तेव्हा अशाच हास्यास्पद मागण्या समोर येतात. जरांगे यांना कायद्याचे ना ज्ञान आहे, ना कुठल्या गोष्टीचे तारतम्य. उद्या जर प्रत्येक जातीने स्वतंत्र मंत्रालयाची मागणी केली तर काय होईल?”


​”कोणाचा तरी राजकीय गेम सेट करण्यासाठीच हे आंदोलन”
​लक्ष्मण हाके यांनी या आंदोलनामागे मोठे राजकीय कारस्थान असल्याचा थेट आरोप केला आहे. “जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाचा मुख्य हेतू मराठा समाजाचे कल्याण करणे हा नसून, केवळ महाराष्ट्रात सामाजिक अस्वस्थता निर्माण करणे, मुख्यमंत्र्यांना खुर्चीवरून खाली खेचणे आणि पडद्यामागून कोणाचा तरी राजकीय स्कोर (पॉलिटिकल गेम) सेट करणे हाच आहे,” असा घणाघात त्यांनी केला.

​यावेळी हाके यांनी केवळ जरांगेंवरच नव्हे, तर सरकार आणि भाजप नेते प्रसाद लाड यांच्या कंपन्यांवरही निशाणा साधला. राज्यात सुरू असलेल्या कंत्राटी भरती आणि खाजगीकरणामुळे शासकीय नोकऱ्या संपुष्टात येत असून, यामुळे मूळ आरक्षणच धोक्यात आले आहे. सरकार आणि आंदोलक या मुख्य मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष भरकटवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---