---Advertisement---
जामनेर तालुक्यातील माळपिंप्री शेत शिवारात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली असून यात मक्यासह ठिबक सिंचनही जळाले आहे. सुमारे 3 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील माळपिंप्री शिवारात वीजतारांच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन एकर मका पीक जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगीत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाकडून मदतीची मागणी करण्यात येत आहे.
माळपिंप्री येथील शेतकरी सुरेश शेनपडू पाटील यांनी आपल्या शेतात तीन एकर क्षेत्रावर मक्याची लागवड केली होती. पीक काढणीच्या टप्प्यावर असतानाच अचानक वीजतारांमध्ये घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाले आणि त्यातून लागलेल्या आगीने संपूर्ण मका जळून खाक झाला.
या आगीत केवळ पीकच नव्हे तर शेतातील ठिबक सिंचन व्यवस्था देखील पूर्णपणे नष्ट झाली आहे. स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र मका कोरडा असल्याने आग वेगाने पसरली आणि मोठे नुकसान झाले.
या तीन एकर क्षेत्रातून सुमारे 150 क्विंटल मक्याचे उत्पादन अपेक्षित होते. सध्या बाजारभाव सुमारे 1700 रुपये प्रतिक्विंटल असल्याने शेतकऱ्याचे जवळपास 3 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर शेतकरी सुरेश पाटील यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.









