---Advertisement---
भारती सवर्णे दिनांक : १ १ मे
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ आणि नाला खोलीकरण योजनेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांच्या प्रभावी समन्वयातून आतापर्यंत ४ लाख क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला असून, यामुळे जलसाठ्यांची क्षमता वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
तीन तालुक्यांत कामे प्रगतीपथावर
मृद व जलसंधारण विभागामार्फत जिल्ह्यातील विविध ठिकाणी कामे सुरू असून, सध्या ३ महत्त्वाच्या ठिकाणची कामे प्रगतीपथावर आहेत.
१) रावेर तालुका: जानोरी येथे कामाला सुरुवात.
२) पारोळा तालुका: शेळावे आणि लोणी सिम येथील कामांना गती.
३) जामनेर तालुका: सोनाळे, मांदणी आणि भारुडखेडा येथे गाळ काढण्याचे काम सुरू.
शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक लाभ
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे
पाण्याचा साठा वाढण्यास मदत होते. धरणातून काढलेला हा सुपीक गाळ शेतात टाकल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.
शेतकऱ्यांनो, गाळ वाहून न्या आणि मिळवा ३५.७५ पैसे प्रति घनमीटर अनुदान!
गाळ वाहून नेणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून ३५.७५ पैसे प्रति घनमीटर प्रमाणे अनुदान थेट बँक खात्यात वितरित करण्यात येणार आहे. यामुळे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
”शासकीय आणि सामाजिक संस्थांच्या सहभागातून जिल्ह्यात गाळ काढण्याची मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे. आतापर्यंत ४ लाख क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला असून, यामुळे पावसाळ्यात पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत होईल.”
— निनाद विवेक रत्नपारखी (कार्यकारी अभियंता, मृद व जलसंधारण विभाग, जळगाव)
सामाजिक संस्थांचे योगदान
भारतीय जैन संघटनेसारख्या सामाजिक संस्थांच्या मदतीने जिल्ह्यातील नाला खोलीकरण आणि जलसाठ्यांच्या पुनरुज्जीवनाचे काम केले जात आहे. नंदुरबार पाठोपाठ आता जळगाव जिल्ह्यातही या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.









