जळगावात रेल्वे उमेदवारांचे आंदोलन चिघळले! ५ व्या दिवशी उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली; सरकारचे केले ‘पिंडदान’

---Advertisement---

 

२००७ मधील रेल्वे भरतीचा पेच; मेडिकल पात्र असूनही नियुक्ती न मिळाल्याने तरुण रस्त्यावर; प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात तीव्र संताप

रेल्वे भरती प्रक्रियेत मेडिकल पात्र ठरूनही गेल्या १९ वर्षांपासून हक्काच्या नियुक्तीसाठी चातकासारखी वाट पाहणाऱ्या उमेदवारांचे जळगावमधील आंदोलन आता अत्यंत तीव्र आणि संवेदनशील वळणावर पोहोचले आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाची प्रशासन, राज्य सरकार किंवा रेल्वे प्रशासनाने साधी दखलही न घेतल्याने आंदोलक कमालीचे आक्रमक झाले आहेत. आज आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आंदोलकांनी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि रेल्वे विभागाचे प्रतीकात्मक ‘पिंडदान’ करून अनोख्या पद्धतीने तीव्र निषेध नोंदवला.

दरम्यान, कडक ऊन आणि पाच दिवसांच्या उपोषणामुळे आज आंदोलनकर्ते किरण फेगडे यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, आंदोलनस्थळी सध्या प्रचंड तणावाचे वातावरण आहे.

काय आहे मुख्य मागणी?
“मेडिकल फिट, तरीही नोकरीपासून वंचित!”

सन २००७ मध्ये रेल्वे प्रशासनातर्फे भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. या प्रक्रियेत सर्व निकष पार पाडून हे उमेदवार ‘मेडिकल पात्र’ (Medical Fit) ठरले होते. मात्र, त्यानंतर तब्बल १९ वर्षे उलटूनही रेल्वे विभागाने त्यांना नियुक्ती पत्रे दिली नाहीत. हक्काची नोकरी मिळवण्यासाठी या तरुणांनी आता थेट जळगावात ‘आरपारची लढाई’ सुरू केली आहे.
५ दिवसांपासून उपोषण: नियुक्तीच्या मागणीसाठी उमेदवारांचे जळगावात गेल्या पाच दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे.

शासकीय अनास्था: पाच दिवस उलटूनही एकाही जबाबदार अधिकाऱ्याने किंवा लोकप्रतिनिधीने आंदोलकांची भेट घेतलेली नाही.

प्रतीकात्मक पिंडदान: सरकारच्या आणि रेल्वे प्रशासनाच्या या ‘मरणासन्न’ संवेदनशीलतेचा निषेध करण्यासाठी आंदोलकांनी थेट पिंडदान विधी केला.

उपोषणकर्ते रुग्णालयात: आंदोलक किरण फेगडे यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने प्रशासनाची धावपळ; रुग्णालयात उपचार सुरू.

जोपर्यंत नियुक्ती नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही!
पाच दिवस अन्नत्याग केल्यामुळे इतर आंदोलकांची प्रकृतीही खालावत चालली आहे. “आमचे आयुष्य आधीच उद्ध्वस्त झाले आहे, आता मागे हटण्याचा प्रश्नच येत नाही. जोपर्यंत रेल्वे विभाग नियुक्तीबाबत ठोस आणि सकारात्मक निर्णय घेत नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण असेच सुरू राहील.

प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे जळगाव जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांमध्ये आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता तरी रेल्वे मंत्रालय जागे होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---