---Advertisement---
जालना शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली असून, पाणीपुरी खाल्ल्यानंतर तब्बल 15 ते 16 जणांना फूड पॉइझनिंगचा (विष बाधा) त्रास झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या घटनेत लहान मुलांचाही समावेश असून सर्व बाधितांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सदर घटना ही जालन्यातील जुना जालना भागातील टट्टूपुरा परिसरात घडली. त्या भागात एका फेरीवाल्याने पाणीपुरीचा गाडा लावला होता. परिसरातील नागरिकांसह अनेक लहान मुलांनी या गाड्यावर पाणीपुरी खाल्ली. मात्र काही वेळातच पाणीपुरी खाल्लेल्या नागरिकांना अचानक उलट्या, जुलाब आणि अशक्तपणाचा त्रास सुरू झाला.
त्रास वाढत गेल्यानंतर रात्री उशिरा अनेक बाधित नागरिकांना जालन्यातील विविध खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीत पाणीपुरीमुळेच फूड पॉइझनिंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महापालिका प्रशासन आणि अन्न सुरक्षा विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, जालना शहरातील फेरीवाल्यांची तातडीने तपासणी करावी, तसेच दोषी फेरीवाल्यावर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.









