---Advertisement---
28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे घडलेल्या दुर्दैवी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त करत जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या वतीने जामनेर पोलीस स्टेशन येथे फौजदारी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली दाखल करण्यात आलेल्या या अर्जात विमानसेवा देणारी व्ही.एस.आर.व्ही. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, त्यांचे संचालक विजय कुमार सिंह व रोहित कुमार सिंह, तसेच गंभीर सुरक्षा त्रुटी असूनही उड्डाणास परवानगी देणारे डीजीसीएचे संबंधित अधिकारी आणि चार्टर एजन्सी यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, सदर अपघातामागे गुन्हेगारी कट असल्याचा संशय असून या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा. संबंधितांविरुद्ध तत्काळ एफआयआर दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच स्वतंत्र तपास पथक नेमावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमांनुसार, विशेषतः सेक्शन 106, 105, 101, 3(5), 125, 238, 336, 337, 339, 340 आणि 409 अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची मागणी अर्जात करण्यात आली आहे.
तक्रार अर्ज सादर करताना राष्ट्रवादीचे स्थानिक नेते दिलीप खोडपे, अॅड. ज्ञानेश्वर बोरसे, प्रल्हाद बोरसे, दत्तात्रय नेरकर, पवन महाजन, गोपाळ राजपूत, विनोद सुरवाडे, अमोल पाटील, पवन बंडे, मोहन चौधरी, मंगलसिंग राजपूत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या तक्रारीनंतर आता पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते आणि पुढील तपासाची दिशा काय ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









