---Advertisement---
जळगाव : जागतिक स्तरावर सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक उद्योगांवरही दिसून येत आहे. अमेरिका, इजराइल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य वातावरणामुळे जळगावातील प्लास्टिक उद्योगाला मोठा फटका बसला आहे. या परिस्थितीमुळे कतार मधून होणारी कच्च्या मालाची आयात मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्लास्टिक पाईप उत्पादन रखडले आहेत.

कच्चा माल वेळेवर उपलब्ध न झाल्याने आणि त्याच्या किमतीत तब्बल ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने जळगावमधील प्लास्टिक आणि कृषी पाईप उद्योगावर गंभीर परिणाम झाला आहे. विशेषतः शेतकऱ्यांसाठी तयार होणाऱ्या प्लास्टिक पाईप उत्पादन करणाऱ्या अनेक कारखान्यांना कामकाज थांबवण्याची वेळ आली आहे.
उद्योगाशी संबंधित व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, कच्चा माल मोठ्या प्रमाणावर परदेशातून आयात केला जातो. मात्र सध्याच्या आंतरराष्ट्रीय तणावामुळे आयात प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला असून उपलब्ध मालाच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे.
---Advertisement---
या दरवाढीमुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे अनेक प्लास्टिक कंपन्यांनी तात्पुरते उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योग बंद पडल्याने कामगारांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, कच्च्या मालाची आयात पुन्हा सुरळीत झाली आणि दर स्थिर झाले तरच उद्योग पुन्हा पूर्वपदावर येऊ शकतील, असे उद्योग क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.









