---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून गेल्या तीन दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. एप्रिलच्या सुरुवातीलाच पावसामुळे नागरिकांना उन्हाळा आणि पावसाचा दुहेरी अनुभव येत आहे.
दरम्यान, हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस पावसाचा इशारा दिला असून ३ आणि ४ एप्रिल रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या काळात ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे उष्णतेचा प्रभाव कमी झाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. बुधवारी जळगावचे कमाल तापमान ३५.६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. साधारणपणे एप्रिलमध्ये तापमानात झपाट्याने वाढ होते, मात्र सध्याच्या बदलत्या हवामानामुळे तापमानात घट झाली आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.









