---Advertisement---
इस्लामाबाद : पाकिस्तानचे राजदूत फैसल नियाज तिर्मिझी यांनी नवी दिल्ली आणि इस्लामाबाद यांच्या अणुसुरक्षा व्यवस्थेबाबत सकारात्मक टिप्पणी केली असून दोन्ही देशांमध्ये परस्पर समजुतीवर आधारित काही महत्त्वाच्या हमी अस्तित्वात असल्याचा दावा केला.
भारत आणि पाकिस्तान यांनी एकमेकांच्या अणुसुविधांवर कोणताही हल्ला न करण्याबाबत दीर्घकाळापासून एक प्रकारची परस्पर समज निर्माण केली आहे आणि सध्याच्या जागतिक तणावाच्या पृष्ठभूमीवर अशा समजुती अधिक महत्त्वाच्या ठरतात, असे त्यांनी सांगितले. पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे अणुऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
या संदर्भात त्यांनी इराणमधील बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पाचा उल्लेख करत त्या प्रकल्पावर थेट हल्ला झाला असता तर त्याचे परिणाम केवळ त्या देशापुरते मर्यादित न राहता संपूर्ण आखाती क्षेत्र आणि पाकिस्तानवरही गंभीर परिणाम झाले असते, असे म्हटले. अशा घटनांमधून संबंधित देशांनी धडा घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
राजदूत तिर्मिझी यांनी असेही म्हटले की अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित आणि अभेद्य राहणे अत्यंत गरजेचे आहे, कारण अशा सुविधांवर कोणताही हल्ला झाल्यास त्याचे परिणाम व्यापक आणि दीर्घकालीन स्वरूपाचे असू शकतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या विषयावर अधिक जबाबदारीने विचार होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्याच्या प्रक्रियेत बाह्य देशांची भूमिका या विषयावर बोलताना त्यांनी रशियाचा उल्लख केला.
रशियामुळे संबंधात समतोल
त्यांच्या मते, रशियाचे दोन्ही देशांशी असलेले संबंध लक्षात घेता ते एक समतोल आणि निष्पक्ष भूमिका बजावू शकतात. पाकिस्तानला शांघाय सहकार्य संघटनेत सक्रिय भागीदार राहायचे असून भविष्यात ब्रिक्ससारख्या आंतरराष्ट्रीय गटात सहभागी होण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.









