---Advertisement---
आषाढी वारीनिमित्त आदिशक्ती संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे आज मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. टाळ-मृदंगांच्या गजरात, “संत मुक्ताबाई”, “ज्ञानोबा माऊली”, “तुकाराम” यांच्या जयघोषाने मुक्ताईनगर नगरी दुमदुमून गेली. हजारो वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.
पालखी प्रस्थानापूर्वी संत मुक्ताबाई मंदिर परिसरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी संत मुक्ताबाईंच्या चरणी नतमस्तक होत महाआरतीत सहभाग घेतला.
अनेक वर्षांची अखंड परंपरा जपणारा हा पालखी सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. वारकऱ्यांनी अभंग, भजन आणि नामस्मरण करत टाळ-मृदंगांच्या तालावर फेर धरला. भक्तिरसात रंगलेल्या वातावरणामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला मिळाली.
विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा असलेल्या परिसरात पालखी प्रस्थानाच्या दिवशीच पावसाने हजेरी लावली. रिमझिम सरींनी सोहळ्याच्या उत्साहात आणखी भर घातली. अनेक वारकऱ्यांनी याला संत मुक्ताबाईंचा आशीर्वाद मानत आनंद व्यक्त केला.
पालखी मार्गावर विविध गावांमध्ये भाविकांकडून स्वागताची तयारी करण्यात आली असून, आषाढी एकादशीच्या निमित्ताने ही पालखी पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी पोहोचणार आहे. संत परंपरेचा वारसा जपत आणि भक्तीचा संदेश देत संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे.









