---Advertisement---
जळगाव जिल्ह्यात उष्णतेने अक्षरशः कहर केला असून जिल्ह्यातील तापमानाने आता ४५ अंशांचा टप्पा पार केला आहे. अवघ्या दोनच दिवसांत तापमानात तब्बल चार अंशांनी वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य आग ओकत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून सकाळपासूनच उष्णतेच्या झळा जाणवत आहेत. दुपारच्या वेळेत तर रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून अत्यावश्यक कामाशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत.
जळगाव जिल्ह्यात कमाल तापमानाची नोंद ४४.५ अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असताना अचानक तापमानात मोठी वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी तुलनेने कमी असलेले तापमान आता झपाट्याने वाढल्याने नागरिकांच्या अंगाची अक्षरशः लाही लाही होत आहे. दुपारच्या वेळेत गरम वाऱ्यांमुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनत असून शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि बाजारपेठा ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
उष्णतेचा सर्वाधिक फटका हा रस्त्यावर काम करणारे कामगार, बांधकाम मजूर, वाहन चालक, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. सकाळीच प्रखर ऊन पडत असल्याने अनेक जणांनी आपल्या कामाच्या वेळेत बदल करण्यास सुरुवात केली आहे. काही भागांमध्ये दुपारी नागरिक घरातच थांबणे पसंत करत आहेत. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळीदेखील उकाडा कायम राहत असल्याने नागरिकांना झोप घेणेही कठीण झाले आहे.
वाढत्या तापमानामुळे आता नागरिकांकडून पारंपारिक शीतपेयांना मोठी मागणी वाढली आहे. शहरातील ऊसाचा रस, लिंबू सरबत, ताक, कोकम सरबत आणि माठातील थंड पाणी विक्री करणाऱ्या दुकानांवर ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. उन्हाचा दाह कमी करण्यासाठी अनेक नागरिक थंड पेयांचा आधार घेताना दिसत आहेत. काही ठिकाणी तर दुपारच्या वेळेत शीतपेय विक्रेत्यांकडे मोठ्या रांगा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
डॉक्टरांकडून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर न पडणे, भरपूर पाणी पिणे, हलका आहार घेणे तसेच उन्हात बाहेर पडताना डोक्यावर कापड किंवा टोपी वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेता लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींनी अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात येत आहे.









