---Advertisement---
राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली असून राज्य मंत्रिमंडळाने शेतकरी कर्जमाफी योजनेला तत्त्वतः मंजुरी दिल्याची माहिती समोर येत आहे. या निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे दीर्घकाळापासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.
या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. तर 65 लाखांपेक्षा अधिक कर्जखात्यांचा समावेश या प्रक्रियेत करण्यात येणार असून त्यासाठी सुमारे 36 हजार 585 कोटी रुपयांचा निधी खर्च होण्याची शक्यता आहे. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र प्रोत्साहनपर लाभ देण्याचाही विचार सरकारकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, सध्या आचारसंहिता लागू असल्याने या निर्णयाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र लवकरच शासन स्तरावर याबाबत अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी विविध आंदोलने करण्यात आली होती. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीनंतर शेतकरी संघटना तसेच आमदार बच्चू कडू यांनीही या प्रश्नावर आंदोलन उभारले होते. त्यानंतर सरकारने 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर या आश्वासनाची पूर्तता होण्याची चिन्हे दिसत आहेत.









