---Advertisement---
जळगाव : वादळी वाऱ्याने तुटलेल्या वृक्षांमुळे शहरात बरेच रस्ते अरुंद झालेत, तुटलेली वृक्षे त्वरित उचलण्याबाबत मनपातर्फे कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यासंदर्भात समाजवादी पक्षातर्फे मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात येणार होते. परंतु , मनपा आयुक्तांनी त्यांना भेटण्यास नकार दिल्याचा आरोप समाजवादी पक्षातर्फे करण्यात आला. याचा निषेध म्हणून निवेदन थेट मनपाच्या प्रशासकीय इमारतीच्या दारावर चिटकविण्यात आले. यावेळी समाजवादी पार्टी प्रदेश सचिव रईस बागवान यांनी नेतृत्व केले.
शहरात तीन ते चार दिवसात झालेल्या पावसाने व वादळाने वृक्ष कोलमडून रस्त्यावर पडलेले आहेत. रस्त्यांवरील वृक्ष उचलण्यात यावेत अशी मागणी करीत समाजवादी पक्षाचे पदाधिकारी दुपारी महापालिकेत दाखल झाले. ते निवेदन घेऊन आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या भेटीसाठी गेले असता आयुक्तांनी त्यांची भेट घेण्यास नकार दिला असा आरोप करीत सपाच्या पदाधिकाऱ्यांनी रोष व्यक्त केला. आज मनपाला सुटी असली तरी आयुक्त हे महापालिकेत हजर असतांना त्यांनी आमची भेट घेणे नाकारले असा आरोप प्रदेश सचिव रईस बागवान यांनी केला.
---Advertisement---
रईस बागवान यांनी तरुण भारत लाईव्हशी बोलतांना सांगितले की, मागील तीन दिवसांपासून शहरात पाऊस व वादळा मुळे रस्त्यांवर वृक्ष पडलेले आहेत. शहरातील प्रत्येक चौकांमध्ये ड्रेनेज नसल्यामुळे पाणी साचले आहे. आम्ही जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी महापालिकेत आलो. मात्र , आयुक्तांनी आमची भेट नाकारली. यामुळे आम्ही महापालिकेच्या प्रवेश द्वारावर हे निवेदन चिटकवित आहोत. आमच्या निवेदनाची आयुक्तांनी दखल घेतली नाही तर समाजवादी पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.