---Advertisement---
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात महायुतीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून तिन्ही पक्षांना क्रॉस व्होटिंगच्या भीती वाटू लागली आहे. मतदान प्रक्रियेत कोणतीही गडबड होऊ नये आणि पक्षनिहाय मतदान सुनिश्चित व्हावे यासाठी महायुतीतील तीनही प्रमुख पक्षांकडून आपल्या मतदारांना व्हिप जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीत काही ठिकाणी नाराजी आणि बंडखोरीचे सूर उमटले होते. विशेषतः नाशिक आणि जळगाव परिसरात भाजप व शिवसेनेतील स्थानिक पातळीवरील मतभेदांमुळे पक्ष नेतृत्वाची चिंता वाढली होती. अखेर वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर ही बंडखोरी शमल्यात जमा झाली आहे. आणि नाराजी काही प्रमाणात नियंत्रणात आणण्यात नेत्यांना यश आलं आहे.
मात्र, निवडणुकीच्या तोंडावर क्रॉस व्होटिंगची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नसल्याने महायुतीकडून अतिरिक्त खबरदारी घेतली जात असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मित्रपक्षांकडून संबंधित मतदारांना पक्षाच्या अधिकृत भूमिकेनुसार मतदान करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. म्हणून या निर्णयामुळे महायुतीत क्रॉस व्होटिंगची भीती असल्याच्या चर्चांना आणखी उधाण आले
राजकीय विश्लेषकांच्या मते, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीतील मतदान हे सभागृहाच्या नियमित कामकाजाचा भाग मानले जात नाही. त्यामुळे अशा निवडणुकांमध्ये पक्षांतर बंदी कायद्याची तरतूद थेट लागू होत नाही. परिणामी, व्हिपचे उल्लंघन केल्यास संबंधित सदस्याचे सदस्यत्व तत्काळ रद्द होईलच असे नाही.
राजकीय संदेश आणि पक्षशिस्त कायम ठेवण्यासाठी व्हिपचे महत्त्व कायम असल्याचे मानले जाते. त्यामुळेच कायदेशीर बंधन नसतानाही महायुतीकडून व्हिप जारी करून मतदानावर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे चित्र दिसत आहे.
मात्र, या निर्णयामुळे महायुतीत क्रॉस व्होटिंगची भीती असल्याच्या चर्चांना आणखी उधाण आले असून निवडणुकीच्या निकालाकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.









