---Advertisement---
प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांची महाराष्ट्रातील एक आक्रमक नेता म्हणून मोठी ओळख आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेसाठी आमदारकीची ऑफर असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत बच्चू कडू आणि उदय सामंत यांच्यात बैठक झाली आहे.
राज्याच्या राजकारणात लवकरच राजकीय घडामोडी या घडणार आहेत. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना विधान परिषदेसाठी आमदारकीची ऑफर दिल्याची बातमी सध्या समोर आली आहे. येत्या काळात विधान परिषदेची निवडणूक ही होऊ घातली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्याकडे सद्यस्थितीत 57 आमदार आहेत आणि विधान परिषदेसाठी एकूण 28 आमदारांचा कोटा आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून दोन आमदार विधान परिषदेवर जाण्याची शक्यता आहे. या दोन जागांपैकी एका जागेसाठी नीलम गोऱ्हे यांचं नाव निश्चित मानलं जात असून दुसऱ्या जागेची संधी कोणाला मिळणार? हा प्रश्न अजून अनुत्तरीत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवलं जाऊ शकतं. तशी त्यांना ऑफर देखील देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांचे राजकीय पुनर्वसन हे एक प्रकारे होणार आहे. कारण सद्यस्थितीमध्ये बच्चू कडू हे आमदार नाही.
मात्र बच्चू कडू यांना आमदारकीची ऑफर देताना शिवसेना पक्षाकडून त्यांना पक्ष विलीनीकरणाची अट ठेवण्यात आली आहे. बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये बच्चू कडूंना विलीन करावा लागेल. तरच त्यांची विधान परिषदेच्या आमदारकीसाठी नियुक्ती होईल अशी माहिती आहे. प्रहार जनशक्ती पक्ष हा बच्चू कडू यांनी स्थापन केलेला पक्ष असून विदर्भात या पक्षाचे मोठं नाव आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ घडवून आणण्याची प्रहार जनशक्ती पक्षाची कुठलीही क्षमता दिसत नसली तरी त्यांचा कार्यकर्त्यांचे जाळं मात्र चांगलं आहे. आणि जर प्रहार जनशक्ती पक्ष हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन झाला तर शिंदेंच्या शिवसेनेचे बळ हे अधिकच वाढणार आहे.
शिंदेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेल्या ऑफर संदर्भात शिंदे सेनेचे नेते उदय सामंत आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांच्यात बैठक पार पडली आहे. या बैठकीत एक महत्त्वाची चर्चा झाली असून विधान परिषदेसाठी बच्चू कडू यांना आमदारकी सह पुढील सहा महिन्यात मंत्रिपद देण्याचाही शब्द देण्यात आल्याचं समोर आलं असून त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे मात्र शिवसेनेत विलीनीकरण करा ही मुख्य अट बच्चू कडूंना देण्यात आली आहे. त्यामुळे बच्चू कडू हे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत चर्चा करतील असं त्यांनी सांगितलं आहे.
जर मंत्रीपद सहा महिन्यांनी देणार आहात तर विलीकरणाची घाई कशाला? सहा महिने प्रहार पक्ष हा तसाच राहू द्या, जेव्हा मंत्रिपद मिळेल तेव्हा विलीनकरण करू, पण बच्चू कडू यांना आमदारकी मिळत असेल तर त्यांनी शिवसेनेत प्रक्ष प्रवेश करावा. अशी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भूमिका आहे.









