महाराष्ट्र शासनाने जगातील सर्वात मोठी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी ‘मेटा’सोबत करार केला आहे. ‘आपले सरकार’ पोर्टलवरील ५०० सेवा आता व्हॉट्सअँपवर उपलब्ध होणार आहे. त्याबाबत मेटा शी करार करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी केली. वांद्रे कुर्ला संकुलात आयोजित ‘मुंबई टेक वीक २०२५’च्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यामुळे शासनाच्या ५०० सेवा आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती होती. शुक्रवारी ‘आपले सरकार’ व्हॉट्सअँप चॅटबॉट संदर्भात ‘मेटा’सोबत सामंजस्य करार करण्यात आला. त्याचबरोबर एमएमआरडीए आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांच्यातही सामंजस्य करार करण्यात आला. ‘एमएमआरडीए’ने ‘एन.पी.सी.आय’ला बीकेसीमध्ये त्यांच्या जागतिक मुख्यालयाच्या उभारणीसाठी भूखंड प्रदान केला. तसेच कौशल-रोजगार-उद्योजकता- नाविन्यता विभाग आणि ‘टीम’सोबत नॉलेज ‘एआय हब’ संदर्भात सामंजस्य करार झाला. उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजक संग्रहालयाची स्थापना केली जाणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
हेही वाचा : दुर्दैवी ! वसतिगृहाच्या खोलीत विद्यार्थिनीने केलं असं काही, दरवाजा उघडल्यानंतर सर्वच थक्क
राज्यात मोबाईल फोनचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला आहे. आतापर्यंत ऑनलाइन सेवा उपलब्ध असूनही काही नागरिक ऑनलाइन प्रक्रियांपासून दूर असतात. मात्र, व्हॉट्सअँपचा सहज आणि सर्वदूर वापर पाहता, आता शासनाच्या महत्त्वाच्या सेवांचा लाभ थेट व्हॉट्सअँपद्वारे घेता येणार आहे. या नव्या सुविधेमुळे महाराष्ट्रात ‘व्हॉट्सअँप गव्हर्नन्स’चा नवा अध्याय सुरू होत आहे. या नव्या योजनेमुळे नागरिकांना अधिक सोयीस्कर आणि वेगवान सेवा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा : मोठी बातमी ! दोन दिवस आधीच धनंजय मुंडेंचा घेतला राजीनामा,’या’ व्यक्तीने केला मोठा दावा
‘मुंबई टेक वीक’च्या उद्घाटन प्रसंगी ऋषी दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जियो कन्वेंशन सेंटर येथे मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचे भविष्यातील रोडमॅप आणि राज्य सरकारच्या तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती दिली. “महाराष्ट्र शासनाच्या धोरणांमुळे राज्य हे देशाच्या स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर आहे. जेव्हा आपण ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहतो, तेव्हा तंत्रज्ञान हा विकासाचा मुख्य आधारस्तंभ असतो. फिनटेक आणि एआय क्षेत्रातील स्टार्टअप्सला गती देण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करत आहे”, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले