---Advertisement---
देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत थाटात साजरी करण्यात आली. महाराष्ट्राप्रमाणेच आग्र्यातही शिवजयंती साजरी करण्यात आली. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आग्र्यात शिवाजी महाराज यांचं स्मारक बांधण्याची घोषणा केली. हे स्मारक अत्यंत भव्यदिव्य असेल की ताजमहलपेक्षाही अधिक लोक शिवरायांचं स्मारक पाहायला येतील एवढं भव्य स्मारक आग्र्यात बांधण्यात येईल, अशी घोषणाच फडणवीस यांनी केली.
आग्र्यात शिवजयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. आग्र्यात एक भव्यदिव्य स्मारक बनेल. मी योगीजींना प्रार्थना करतो. आम्हाला परवानगी द्या. महाराष्ट्र सरकार जमीन संपादित करेल. महाराष्ट्र सरकार आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तयार करेल. माँ कसम मी सांगतो, एकदा हे स्मारक बनलं तर ताजमहलपेक्षा अधिक लोक हे स्मारक पाहायला आले नाही तर माझं नाव बदलून ठेवा. याबाबत मी स्वत: उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलणार आहे. त्यांना निवेदन देणार आहे. तुम्हाला विनंती करतो तुम्हीही माझी बाजू मांडा. आपल्याला भव्य स्मारक बनवायचं आहे, अशी घोषणाच देवेंद्र फडणवीस यांनी केली.
शिवाजी महाराज युगपुरुष
शिवाजी महाराज स्वाभिमानाने आग्र्यात राहिले. तिथून स्वराज्यात गेले आणि हारलेले २४ किल्ले पुन्हा जिंकले. औरंगजेब काहीच करू शकला नाही. ही ताकद शिवाजी महाराजांची होती. शिवाजी महाराज केवळ राजा नव्हते, तर ते एक युगपुरुष होते, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. आग्य्रातील कोठी (जी आज मीना बाजार या नावाने ओळखली जाते) जेथे छत्रपती शिवाजी महाराजांना बंदी ठेवण्यात आले होते, तेथे भव्य स्मारक उभारु असंही ते म्हणाले.
औरंगजेब परत गेला नाही
औरंगाबादला आम्ही छत्रपती संभाजीनगर बनवलेलं आहे, आमचे हिरो छत्रपती संभाजी महाराज आहेत. औरंगजेब हा जिंकण्यासाठी आला, मात्र त्याची कबर ही महाराष्ट्रात झाली, औरंगजेब जिवंत परत गेला नाही. औरंजेब आमचा पूर्वज नाही. तो आमचा सुपर हीरो नाही, असंही ते म्हणाले.