---Advertisement---
नवी दिल्ली : अरबी समुद्रात भारताने पाकिस्तानच्या हालचालीला चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तान एका गुप्त क्षेपणास्त्राची चाचणी करण्याच्या तयारीत असतानाच, भारतीय नौदलाने आपले अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा माग काढणारी आयएनएस ध्रुव युद्धनौका अरबी समुद्रात उतरवली. यामुळे पाकिस्तानची रणनीती अपयशी ठरली.
पाकिस्तानने १४ आणि १५ एप्रिल दरम्यान कराची, ओरमारा, ग्वादर आणि सोनमियानी या किनारपट्टीजवळच्या विस्तीर्ण सागरी क्षेत्रात सागरी इशारा जारी केला होता. सुमारे ४१५ ते ४५० किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला होता. कोणत्याही क्षेपणास्त्र किंवा लष्करी चाचणीपूर्वी तांत्रिक भाषेत असा नोटम जारी केला जातो.
पाकिस्तानच्या या संशयास्पद हालचालींचा सुगावा लागताच भारतीय नौदलाने अत्यंत वेगाने हालचाली केल्या. पाकिस्तानने जाहीर केलेल्या वेळेच्या तब्बल २४ तास आधी, म्हणजेच १३ एप्रिल रोजीच भारताने आयएनएस ध्रुव अरबी समुद्रात तैनात केली. शत्रूच्या क्षेपणास्त्रांचा मागोवा घेण्याची विशेष क्षमता या युद्धनौकेत आहे.
पाकिस्तान सैन्याने नोटम जारी करण्यामागची आपली योजना स्पष्ट केलेली नाही. तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तान एक तर जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची किंवा लांब पल्ल्याच्या समुद्रातून डागल्या जाणाऱ्या नौदल प्रणालीची चाचणी घेण्याच्या तयारीत होता.









