---Advertisement---
धरणगाव शहरातील खत्री गल्ली परिसरात एका घरातील वीज मीटरला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली असून महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
धरणगाव शहरातील खत्री गल्ली येथील रहिवासी गणेश रावतोळे यांच्या घरातील विद्युत मीटरला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. आग इतकी भीषण होती की ती विझवण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वेळेत आग आटोक्यात न आणली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, खत्री गल्ली परिसरात लोड शेडींगचा गंभीर प्रश्न असून याबाबत वारंवार विद्युत वितरण कंपनीकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
“दोन दिवसांपूर्वी अधिकारी आणि कर्मचारी परिसरात आले होते, मात्र त्यांनी केवळ औपचारिक पाहणी केली. समस्येचे निराकरण करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही,” अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.
या घटनेनंतर “नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या निष्काळजीपणाला जबाबदार कोण?” असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. परिसरातील विद्युत यंत्रणेची तातडीने तपासणी करून योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.









