---Advertisement---
दिवंगत अजितदादा पवार यांच्या विमान अपघातावरून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका माध्यमाशी बोलताना अत्यंत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ब्लॅक बॉक्सचा डेटा सार्वजनिक झाल्यानंतर जर घातपाताचा संशय स्पष्ट झाला, तर “दादांची शपथ घेऊन सांगतो, संबंधितांच्या घरात चिता जाळायला कुणीही शिल्लक राहणार नाही”, असा इशारा त्यांनी दिला आहे.
आमचे अजितदादा हे महाराष्ट्रातील लाखो लोकांचं श्रद्धास्थान होते. त्यांच्या निधनाची बातमी आजही महाराष्ट्र पचवू शकलेला नाही. अपघातानंतर मृतदेहाची ओळख कशी पटली, यावरून अनेक शंका उपस्थित होत आहेत. आधी हातातील घड्याळावरून ओळख पटल्याचं सांगण्यात आलं, मात्र नंतर कपड्यांवरून ओळख पटल्याची माहिती समोर आली. या सगळ्या बाबी संशयास्पद असल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
तर अपघाताच्या दोन ते तीन दिवस आधी अजितदादांची भाषण झालं हजोत त्यात ते म्हणाले होते कि, “माणसाच्या जीवनाचं काही खरं नाही, आपण कोणीही कायमचं राहणार नाही”, असे त्यांचे शब्द होते. त्यांना काहीतरी चाहूल लागली होती का ? असा सवालही आमदार अमोल मिटकरींनी उपस्थित केला. जर या अपघातामागे काही काळं असल्याचं निष्पन्न झालं, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
अमोल मिटकरी यांनी मृतदेह ओळखीबाबत आणखी एक दावा केला. अजितदादांच्या पायाला फंगल इन्फेक्शन होतं आणि त्यांचा शंकर नावाचा निष्ठावंत कार्यकर्ता दररोज त्यांच्या पायाला तेल लावायचा. याच फंगल इन्फेक्शनमुळे सुरुवातीला दादांची ओळख पटल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, अजितदादांच्या स्मृती जपण्यासाठी मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण’ योजनेला “अजितदादा पवार लाडकी बहीण योजना” असे नाव द्यावे, यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचंही अमोल मिटकरी यांनी सांगितलं.









