---Advertisement---
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारा वाद समोर आला आहे…… भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप करत राजकीय वातावरण तापवले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना पडळकर यांनी दावा केला की, भोंदूबाबा अशोक खरात याने जयंत पाटील यांना माणसाच्या रक्ताने आंघोळ घातली होती. त्यांनी असा आरोप केला की, सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे हा प्रकार घडला असून, राजकीय करिअर चांगले व्हावे यासाठी अशा प्रकारच्या अंधश्रद्धेचा अवलंब करण्यात आला.
बोलताना गोपीचंद पडळकर इथेच थांबले नाहीत… त्यांनी पुढे असेही म्हटले की, जयंत पाटील हे आपल्या मुलासह अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरात गेले होते. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि खरंच रक्ताने आंघोळ घालण्यात आली का, याचा तपास समोर आला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रकरणात आणखी गंभीर आरोप करत पडळकर म्हणाले की, अशोक खरातवर नरबळी दिल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे जयंत पाटील यांना ज्या रक्ताने आंघोळ घालण्यात आली, ते नेमकं कोणाचं होतं, हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. “स्वतःला पुरोगामी म्हणवणारे नेते अशा भोंदूगिरीत का सहभागी झाले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरही पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली. गर्भवती महिलांवर अत्याचाराचे आरोप असलेल्या व्यक्तीशी संबंध ठेवणे हे अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. “अशा व्यक्तीला आश्रय देणाऱ्यांची भूमिका काय?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच, जलसंपदा मंत्री असताना जयंत पाटील यांनी अशोक खरातसाठी तब्बल ४० किलोमीटरची पाण्याची पाइपलाईन दिल्याचा आरोपही पडळकरांनी केला. या निर्णयामागे मोठा राजकीय हस्तक्षेप असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
राजकीय टोलेबाजी करताना पडळकर म्हणाले की, “मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले जयंत पाटील आता झेडपी पातळीवर आले आहेत… पुढे ते ग्रामपंचायतीपर्यंत येतील,” असा टोला त्यांनी लगावला.
याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुरोगामी विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका केली. “एकीकडे फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार मांडायचे आणि दुसरीकडे भोंदूबाबांना घरी आणून पूजा करायची, हा दुटप्पीपणा आहे,” असे ते म्हणाले.
वाद अधिक चिघळवत पडळकरांनी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य करत असा टोला लगावला की, “जर जयंत पाटील यांच्यावर अशोक खरातची कृपा असेल, तर त्यांनी त्याचे मूत्रही प्राशन केले असेल,” असेही त्यांनी म्हटले. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या सर्व आरोपांवर अद्याप Jayant Patil यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेवटी पडळकरांनी स्पष्ट केले की, “हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊलींचा आहे… अशा राज्यात भोंदूगिरीला स्थान नाही. अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.”
आता या सर्व प्रकरणात पोलिस तपासातून नेमकं काय समोर येतं… आणि या आरोपांवर जयंत पाटील काय भूमिका घेतात… याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.









