---Advertisement---
अमळनेर शहरातील सुरू असलेल्या पैलाड भागातील संत सखाराम महाराज यात्रेत दोन गटांतील जुना वाद पुन्हा उफाळून आल्याने जोरदार हाणामारी झाली. या प्रकारात चाकू व लोखंडी रॉडचा वापर झाल्याने तिघेजण जखमी झाले असून, परस्परविरोधी फिर्यादींवरून दोन्ही गटांतील ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर शहरात दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादातून दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता. यात्रेच्या दिवशी रात्री हा वाद पुन्हा चिघळला. यात्रेत फिरत असताना एकमेकांकडे पाहून शिवीगाळ सुरू झाली आणि त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले.
या वेळी काही जणांनी हातातील लाकडी दांडे, लोखंडी रॉड तसेच चाकूचा वापर केल्याचा आरोप आहे. एका तरुणाच्या छातीवर चाकूने वार करण्यात आला तर दुसऱ्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. मारहाणीमध्ये आणखी एक जण जखमी झाला असून, जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
घटनेनंतर यात्रास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींच्या जबाबावरून दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद दिल्यानंतर ११ जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत. यात्रेसारख्या धार्मिक ठिकाणी झालेल्या या रक्तरंजित प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.









