---Advertisement---
श्री.चंद्रेशखर जोशी (संपादक, दै.तरुण भारत, जळगाव)
परवा.. परवा एक बातमी प्रसिद्ध झाली…. रस्ता अपघातात वंशाचा दिवा विझला… कुटुंबाचा शोक अनावर.. त्यापूर्वी बातमी होती मित्र.. मित्र नदीच्या डोहात पोहायला गेले अन् दोघांचा बुडून मृत्यू झाला… दोन्ही मुले त्या घरातील एकुलते होते. अशा प्रकारचे वृत्त वृत्तपत्रांमध्ये नेहमी येत असते.. बातमी वाचत्यानंतर अनेकांना गहिवरून येते.. हळहळ व्यक्त होते. काही दिवसांनी सर्वजण ती घटना विसरतात… मात्र त्या कुटुंबाचे काय ? त्या कुटुंबातील आई… वडिल व इतर सदस्यांची अवस्था काय असेल… विचार करवत नाही. काळ बदलतोय.. जीवनशैली बदलते आहे आणि त्याच बरोबर कुटुंब व्यवस्थाही वेगाने बदलत चालली आहे.
एकेकाळी ‘हम दो हमारे दो ही संकल्पना स्वीकारली गेली पण तीही मागे पडून ‘हम दो हमारा एक’ तर काही ठिकाणी ‘हम दो, नो चाईल्ड’ अशी परिस्थिती दिसून येते. या बदलाचा परिणाम केवळ कुटुंबाच्या आकारावरच नाही तर नातेसंबंधांच्या अस्तित्वावर होत आहे. पूर्वीची संयुक्त कुटुंब पद्धती म्हणजे नात्याची एक समृद्ध श्रृंखला होती. एका घरात आजी आजोबा, काका-काकू, आत्या, मामा चुलत भाऊ बहिणी असे अनेक जण एकत्र रहात असत. कुटुंबातील त्या वेळच्या वातावरणात एकमेकांबद्दल एक वेगळीच ओढ..
आपुलकी, प्रेम, जीव्हाळा असायचा. एक सुरक्षेची भावना एकत्र कुटुंबात असायची. मुलांना विविध नात्यांचा अनुभव मिळायचा, संस्कार मिळायचे आणि जीवनातील अनेक गोष्टी शिकायला मिळत असत. मात्र आजच्या काळात ही कौटुंबिक व्यवस्था हळू हळू लोप पावत आहे. लहान कुटुंबे, वेगळे रहाणे आणि मर्यादित नाते संबंध ही नवी वास्तवता बनली आह.
या बदलामागे अनेक कारणे आहेत. वाढती महागाई, शिक्षण आणि आरोग्याचा खर्च घरांची मर्यादीत जागा या काही आर्थिक कारणांमुळे लोक कमी मुले असलेली बरी यालाच प्राधान्य देतात. तर काहींच्या या मागील भावना फार वेगळ्या असतात. करिअरची धावपळ, स्त्री-पुरूष यांच्यातील कामकाजाची व्यस्तता आणि स्वतःच्या आयुष्याला अधिक महत्व देणारी जीवनशैली यामुळे मोठ कुटुंब सांभाळण कठीण होत. वाढते शहरीकरण आणि स्थलांतरामुळेही संयुक्त कुटुंबाची साखळी तुटत चालली आहे. या सगळ्या प्रक्रियेचा परिणाम नातेसंबंधावर होत आहे. कुटुंबातील अनेक नाती केवळ शब्दांपुरती उरलीत का? अशी भीती निर्माण होत चालली आहे. भविष्यात मुलांना या नात्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल की नाही? असा प्रश्न निर्माण होत चालला आहे. प्रत्येक समाजात बदल होत आहेत.. हे नक्की मात्र काही समाज याला अपवाद ठरत असल्याचे लक्षात येते.
आज मुस्लिम कुटुंबांमध्ये घर छोटे असले तर आठ ते दहा जण रहात असल्याचे लक्षात येते. उत्पन्न कमी असले तरी लहान मुले.. होणारे अपत्य हे ‘अल्ला की देन’ ही भावना मोठ्या प्रमाणात रूजलेली दिसते. आयुष्य घेऊन येणाऱ्या प्रत्येकाची व्यवस्था ‘उपरवाला करता है..’ तुम तुम्हाला काम करो…! याच भावनेतून कुटुंब वाढताना दिसते. काही संस्था.. चळवळींकडून आवाहन केले जाते.. त्याकडे गांभीर्याने आज बघतोय कोण? केवळ स्वतःच्या आयुष्याचा विचार करून एक अपत्य मग तो मुलगा असो वा मुलगी.. बस.. मात्र त्यांच्या भविष्याचा विचार फार कमी होत असल्याचे लक्षात येते.
‘वंशाचा दिवा’ ही संकल्पनाही बदलत चालली आहे. हे निश्चित कौतुकास्पदच. मात्र आज मुलगीही तितकीच सक्षम आहे. ती आई वडिलांची जबाबदारी सांभाळते, कुटुंबाचा आधार बनते आणि संस्काराची परंपरा पुढे नेते. बदलत्या काळात एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कुटुंबाचा आकार लहान झाला म्हणून नात्यांची उब कमी व्हायला हवी असे नाही. नाती जपण्याची इच्छा आणि प्रयत्न असतील तर बऱ्याच गोष्टी साध्य होऊ शकतात. एकच अपत्य असलेल्या कुटुंबात त्या एका जीवाभोवती आई वडिलांचा सार जग फिरत असत. त्याच्या हास्यात त्यांचा आनंद आणि वेदनेत धक्का बसण असे चक्र असते. अचानक एखादा अपघात होऊन ते लेकरू हिरावल गेल तर तो फक्त एक मृत्यू नसतो तर त्या कुटुंबात जणू भूकंप होण. अपघात ही न टळणारी मालिका आहे.
मानवी चुकांमुळे, हलगर्जीपणामुळे ते होतात पण..त्याचे दुरगामी परिणाम एका कुटुंबावर होत असतात. वृत्तापत्रांमधून येणाऱ्या बातम्यामुळे केवळ हळहळ व्यक्त करणे एवढाच उपाय आहे काय? त्यामुळेच वेळीच सुधारण्याची वेळ आली आहे… प्रत्येकानेच याचा गांभीयनि विचार केलेला बरा.









