---Advertisement---
जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीचे राजकीय नाट्य अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. माजी सभापती सुनील महाजन यांनी अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर ८ मे रोजी आपला राजीनामा दिल्यानंतर, आता दि. १८ मे रोजी नवीन सभापती निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. आपली वर्णी लागावी यासाठी संचालकांच्या गोटात मोठी हालचाल सुरू झाली असून, दोन बड्या नावांमध्ये रस्सीखेच आहे.
भाजपच्या दोन श्रेष्ठींच्या हातात ‘रिमोट कंट्रोल’ दोघांच्या भांडणात होणार ‘तिसऱ्या’चा लाभ..?
बाजार समितीतील सत्तासमीकरणे पाहता, नवीन सभापती कोण होणार? याचा अंतिम निर्णय राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण हेच घेणार आहेत. लक्ष्मण पाटील आणि मनोज चौधरी या दोघांनीही दावेदारी केली असली, तरी भाजपचे वरिष्ठ नेते कोणत्या नावावर शिक्कामोर्तब करतात, यावर सर्व काही अवलंबून आहे.
इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, संचालकांचे मन वळविचे प्रयत्न सुरू आहेत:
एकीकडे पाटील आणि चौधरी यांच्यात स्पर्धा सुरू असतानाच, राजकीय वर्तुळात तिसऱ्याच एखाद्या नावाचा विचार होऊ शकतो का? अशीही चर्चा रंगली आहे. गिरीश महाजन धक्कातंत्राचा अवलंब करत एखाद्या अनपेक्षित नावावर पसंती दर्शवतात की या दोन इच्छुकांपैकी कोणाची तरी वर्णी लागते, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
११ मे रोजी, जळगाव शहरातील एका शासकीय विश्रामगृहावर बाजार समितीच्या संचालकांची महत्त्वाची बैठक पार पडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत लक्ष्मण पाटील आणि मनोज चौधरी या दोन्ही ज्येष्ठ संचालकांनी सभापतिपदासाठी आपली प्रबळ दावेदारी मांडली आहे.









