---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चोपडा-विरवाडा मार्गावर सोमवारी पहाटे भीषण अपघाताची घटना घडली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अर्टिका कार दुभाजकावर जोरात आदळली. या अपघातात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

या कार अपघातातील मृतांमध्ये राहुल अमृत भोई आणि मयुर अरुण राजपूत यांचा समावेश आहे. हे पाचही तरुण गेल्या आठ दिवसांपासून जैन धर्मीयांच्या पारमार्थिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचा शेवटचा दिवस असल्याने पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ते विरवाडा येथून चोपड्याकडे परतत होते.
दरम्यान, कार (MH 19 BS 1008) वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन दुभाजकावर आदळले. अपघाताची तीव्रता इतकी होती की गाडीचे मोठे नुकसान झाले.
---Advertisement---
या दुर्घटनेत विजय अमृत भोई (वय ३५), राकू राजपूत (वय ३०) आणि बंटी कोळी (वय ३०) हे तिघे जखमी झाले आहेत. त्यापैकी विजय भोई यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. राकू राजपूत आणि बंटी कोळी यांच्या हात-पायांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर चोपडा येथील मोरेश्वर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे चोपडा परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.









