---Advertisement---
यावल तालुक्यातील अकलूद गावाजवळ दुचाकी चालवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना २४ मे रोजी घडली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात एका आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फैजपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकलूद शिवारातील माऊली कृषी केंद्राजवळून आसाराम बापू आश्रमाकडे जाणारा कच्चा रस्ता आहे. या रस्त्यावर दिलीप कामा चव्हाण (रा. पाडल्यातलाव, ता. झिरण्या, जि. खरगोन, मध्य प्रदेश) आणि निखिल रवींद्र कोळी (रा. खिर्डी बुद्रुक, ता. रावेर) हे दुचाकीवरून जात होते.
दिलीप चव्हाण हा मद्यधुंद अवस्थेत असल्याने निखिल कोळी याने त्याला, “तू दारू पिलेला आहेस, मोटरसायकल मी चालवतो,” असे सांगितले. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला.
वाद वाढल्यानंतर निखिल कोळी याने दिलीप चव्हाण याला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात सहायक फौजदार मोती पवार यांच्या फिर्यादीवरून निखिल रवींद्र कोळी याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद गाभणे करीत आहेत.









