---Advertisement---
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक तसेच महाराष्ट्राला हादरवणारी घटना समोर आली आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात शिक्षणासाठी राहणाऱ्या १० विच्या काही विद्यार्थ्यांवर गंभीर अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील दहावीमध्ये शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी पाचवी ते आठवीपर्यंतच्या लहान विद्यार्थ्यांना रॅगिंगच्या नावाखाली धमकावत त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार समोर आली आहे. हा प्रकार वसतिगृहापासून सुमारे 500 मीटर अंतरावर असलेल्या पंडित जंगलात रेल्वे कॉटेजजवळील झाडाझुडपांच्या एकांत जागेत घडत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
या ठिकाणी कोणालाही संशय येणार नाही अशा एकांत जागेचा गैरफायदा घेत हा प्रकार सुरू असल्याचा आरोप आहे. काही विद्यार्थ्यांना धमकावून तसेच नशेची औषधे आणि मद्य देऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.
पीडित विद्यार्थ्यांनी हा प्रकार सांगण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून त्यांना गप्प बसण्याचा दबाव टाकण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी सात विधीसंघर्षित बालकांसह वसतिगृहाच्या अधीक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक ग्रामीण पोलिसांसह फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पाहणी करून काही महत्त्वाचे नमुने ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचाही तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.









