---Advertisement---
चोपडा शहरात कर थकबाकीदारांविरोधात नगरपरिषद प्रशासनाने मोठी मोहीम सुरू केली आहे. पहाटेपासूनच पथकांनी शहरातील विविध भागांत धडक कारवाई करत अनेक व्यावसायिक गाळ्यांना सील ठोकले तसेच पाणीपट्टी न भरलेल्या नागरिकांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले.
प्रशासनाच्या माहितीनुसार, शहरात सुमारे 4.5 कोटी रुपयांची थकबाकी बाकी असून ती वसूल करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. कारवाईदरम्यान प्रमुख भागांतील 30 गाळे सील करण्यात आले, तर सुमारे 50 पाणी कनेक्शन खंडित करण्यात आली आहेत.
नगरपरिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, कर भरण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर आता थकबाकीवर दरमहा 2 टक्के व्याज आकारले जात आहे. “बिल मिळाले नाही” ही कारणे यापुढे ग्राह्य धरली जाणार नाहीत, असे प्रशासनाने सांगितले आहे.
दरम्यान, शहरातील अजूनही मोठ्या संख्येने नागरिक आणि व्यापारी थकबाकीदार असून ते प्रशासनाच्या नजरेत आहेत. येत्या 22 मार्चनंतर वसुली मोहिमेचा पुढील टप्पा अधिक तीव्र स्वरूपात राबवला जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सध्या कारवाईचा वेग मर्यादित ठेवण्यात आला असला तरी, त्यानंतर कोणतीही सवलत न देता कठोर पावले उचलली जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी वेळेत कर भरून पुढील कारवाई टाळावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.









