---Advertisement---
पावसाळ्यापर्यंत यावल शहरातील नागरिकांना पुरेल एवढा पाणी साठा उपलब्ध झाला असून आज हातनूर धरणा च्या पाटचारीतून यावल नगरपालिकेच्या साठवण तलावात प्रत्यक्ष पाणी सोडण्यात आले आहे.
यावल शहराला हातनूर धरणाच्या पाट चारी मधून पाणीपुरवठा करण्यात येतो. ते पाणी नगरपालिकेच्या साठवण तलावात घेण्यात येते. व नंतर ते जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून शहराला दिले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून तलावातील जलसाठा कमी झाल्याने व विद्युत वितरण कंपनी मार्फत होणारा वीजपुरवठा उन्हाळ्यामुळे खंडित होत असल्याकारणाने अनियमित पाणी पुरवठा होत होता. व त्यावरून आरोप प्रत्यारोप झाले होते. पाटबंधारे विभागाने यावल नगरपालिकेसाठी आरक्षित असलेले हक्काचे आवर्तन मिळावे म्हणून येथील नगराध्यक्षा सौ छायाताई अतुल पाटील यांनी नगरपालिके मार्फत एप्रिल अखेरीस जिल्हाधिकारी यांचेकडे पत्रव्यवहार केला होता त्याच अनुषंगाने शहरात पाणी टंचाई निर्माण होऊ नये म्हणून दिनांक ११ मे रोजी पाणीसोडण्याच्या लेखी आदेश संबंधित विभागाला देण्यात आले होते.
आज प्रत्यक्ष साठवण तलावात पाणी पोचणार होते म्हणून येथील नगराध्यक्षा सौ छायाताई पाटील,पाणीपुरवठा अभियंता अनुराधा पाटील, कार्यालयीन अधीक्षक कोल्हे, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील , नगरसेवक पराग सराफ यांचेसह कार्यकर्ते यांनी पाहणी केली असून पावसाळ्यापर्यंत यावल येथील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असून नागरिकांनी काळजी करू नये व पाण्यात राजकारण करणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ छायाताई पाटील यांनी केले आहे.









