---Advertisement---
धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा शहरात अर्थात मंत्री जयकुमार रावल यांच्या मतदारसंघात घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अमित गॅस एजन्सीसमोर आज शेकडो नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. ‘मे’च्या भर उन्हात तासन्तास उभे राहून सिलेंडरची प्रतीक्षा करणाऱ्या गोरगरीब जनतेमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
मे महिन्याच्या तीव्र उष्णतेत हातात बुकिंग पावत्या घेऊन महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार आणि रोजंदारी करणारे नागरिक एजन्सीसमोर थांबलेले दिसून आले. अनेकांनी सकाळपासून नंबर लावूनही वेळेत सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार केली. मात्र अमित गॅस एजन्सी सह प्रशासन याबाबत कुठलीही उपाययोजना करताना दिसत नाहीये. त्यामुळे प्रशासन गरीब जनतेच्या जीवावर उठलंय की काय असा सवाल सध्या नागरिक उपस्थित करत आहेत.
गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना आपली रोजीरोटी आणि कामधंदे बाजूला ठेवावे लागत असल्याने सामान्य जनतेमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी वाढत आहे. काही नागरिकांनी पहाटेपासून गोडाऊन परिसरात जाऊन रांगा लावल्याचेही सांगितले.
एकीकडे “डिजिटल इंडिया आणि विकासाच्या घोषणा एकीकडे, तर दुसरीकडे जीवनावश्यक सेवांसाठी उन्हात उभ्या रांगा,” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गॅससारख्या मूलभूत सुविधेसाठी होणारी ही धावपळ सामान्य माणसाच्या सहनशीलतेची परीक्षा घेत असल्याची भावना तसेच प्रशासन नागरिकांच्या जीवावर उठले आहे अशी भावना व्यक्त होत आहे.
लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी, पुरवठा विभाग आणि संबंधित प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









